कामगार वर्गाच्या एकजुटीसाठीच्या संघर्षाची ५० वर्षे

वर्गीय एकजूट वर्ग संघर्ष
शोषण समाप्त करण्यासाठी,
समाज परिवर्तनासाठी, वर्ग संघर्ष
ही दृष्टी घेऊन १९७० मध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयु) ची स्थापना झाली. या वर्षी ३० मे या सिटूच्या स्थापना दिवशी, सिटूची सुवर्ण जयंती साजरी करण्याच्या वर्षभराच्या उत्सवाची सुरवात होत आहे.
ही दृष्टी सिटूच्या घटनेमध्ये अशी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे: सिटू मानते की कामगार वर्गाच्या शोषणाचा अंत फक्त सर्व उत्पादनाच्या, वाटपाच्या आणि देवाणघेवाणीच्या साधनांचे सामाजीकरण करून आणि समाजवादी राज्य स्थापित करूनच केला जाऊ शकतो. समाजवादाच्या आदर्शांना वेगाने आपलेसे करून समाजाच्या शोषणापासून पूर्ण मुक्तीच्या आपल्या ध्येयासाठी सिटू खंबीरपणे उभी राहू शकते.
पुढे जाऊन, वर्ग संघर्षाशिवाय कोणतेही परिवर्तन घडवून आणले जाऊ शकत नाही या भूमिकेवर सिटूचा ठाम विश्वास असून कामगार वर्गाला वर्ग समन्वयाच्या मार्गावर घेऊन जाण्याच्या प्रयत्नांना सिटू सातत्याने परास्त करेल.
ही दृष्टी काळाच्या परिक्षांमध्ये खरी उतरली आहे. पन्नास वर्षांच्या अनुभवाने आपली घटनात्मक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठीची दृष्टी अजून पुढे विकसित करण्याचा सिटूचा निर्धार अजून मजबूत केला आहे.
सिटूचा जन्म अशा काळात झाला जेव्हा देशातील कामगार वर्ग त्यांच्या कामाच्या आणि जगण्याच्या परिस्थितीवरील वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या असंतोष आणि संतापाने खदखदत होता. कारखाने बंद होणे, नोकऱ्या जाणे, वाढते कंत्राटीकरण, सामुहिक वाटाघाटी करण्याचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षा नाकारले जाणे यामुळे देशातील विविध भागांमधील विविध क्षेत्रांमध्ये लढे आणि संपांचा उद्रेक झाला होता. ताग कामगार, कोळसा कामगार, पोलाद कामगार, वस्त्रोद्योग कामगार, वाहतूक कामगार आणि अन्य विविध क्षेत्रांमधील हजारो कामगार लढ्याच्या मार्गावर पुढे जात होते.
या हल्ल्यांच्या विरोधात, तेव्हाच्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात, शोषणकारी धोरणांच्या सत्तेच्या विरोधात प्रत्येक क्षेत्रातील सर्व कामगारांना संघटित करणे, संयुक्त संघटित लढ्यांसाठी सर्व क्षेत्रांमधील सर्व कामगारांना संघटित करणे ही काळाची गरज होती. समस्त कामगार संघटना चळवळीला या हल्ल्यांच्या तसेच धोरणांच्या विरोधात एक मजबूत वर्गसंघर्ष उभारण्यासाठी संघटित करणे ही काळाची गरज होती.
परंतु प्रमुख डाव्या कामगार संघटनेच्या, एआयटीयुसीच्या तेव्हाच्या नेतृत्वाने दोन स्तंभीय धोरणाच्या नावाखाली वर्ग संघर्षाचा नाही तर वर्ग समन्वयाचा मार्ग निवडला. वर्ग संघर्षाच्या कल्पनेचीच चेष्टा केली जात होती. एआयटीयुसीच्या नेतृत्वातल्या वर्गीय एकजूट आणि वर्ग संघर्षाला अनुकूल असलेल्या विभागाचा छळ केला जात होता, त्यांना त्रास दिला जात होता. त्यांना एकाधिकारशाहीने आणि अपमानजनक पद्धतीने नेतृत्वाच्या पदांवरून, युनियनमधून हटवले जात होते. वर्ग संघर्षाला पाठिंबा देणाऱ्या युनियन्सना संलग्नता नाकारली जात होती. त्यांची संलग्नता रद्द केली जात होती.
संघटनेला वर्ग समन्वयाच्या आणि सत्ताधारी वर्गांशी तडजोड करण्याच्या मार्गापासून दूर नेण्याचे जवळ जवळ दहा वर्षे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सरकारच्या धोरणांविरोधात देशाला संयुक्त लढ्यांच्या मार्गावर घेऊन जाणारे नवे कामगार संघटना केंद्र उभारण्याची गरज खूप तीव्रतेने जाणवू लागली होती. सिटूचा जन्म एकजूट आणि संघर्ष ही वादळी घोषणा सोबत घेऊन झाला. बी टी रणदिवे यांची निवड पहिले अध्यक्ष म्हणून तर पी राममूर्ती यांची निवड पहिले सरचिटणीस म्हणून करण्यात आली.
तिच्या स्थापनेनंतर लवकरच सिटूने आपल्या कृतीमधून तिला एकटे पाडणाऱ्या आणि तिच्या एकजुटीच्या घोषणेची खिल्ली उडविणाऱ्यांना योग्य उत्तर दिले.
·         सिटूच्या स्थापनेनंतर तिला एकटे पाडण्यासाठी तेव्हाच्या श्रम मंत्र्यांच्या पुढाकाराने आयएनटीयुसी, एआयटीयुसी आणि एचएमएस यांना सोबत घेऊन सरकारच्या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (एनसीटीयु) चे गठन करण्यात आले. सिटूने सरकारच्या वेतन गोठवण्याच्या, अनिवार्य ठेव योजनेसारख्या धोरणांविरुद्ध लढण्यासाठी इतर कामगार संघटना केंद्रांना व औद्योगिक महासंघांना सोबत घेऊन युनायटेड कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (युसीटीयु) चे गठन करून प्रभावीपणे लढा दिला.
·         संयुक्त संघर्ष पुढे नेण्यासाठी उद्योग आणि सेवा क्षेत्रातील इतर शक्तींना संघटित करण्याच्या सिटूच्या जोरदार प्रयत्नांमुळे सत्ताधारी वर्गाची सिटूला एकटे पाडण्याची रणनिती फार काळ चालू शकली नाही. तीनच वर्षात एनसीटीयु कोसळली. वर्ग समन्वयाच्या धोरणांच्या विरोधात सिटूच्या सातत्याच्या लढ्याच्या माध्यमातून देशातील कामगार संघटना चळवळीमध्ये नवीन परस्परसंबंध विकसित व्हायला लागले.
·         सिटूच्या स्थापनेनंतर लवकरच झालेला सर्वात महत्वाचा संयुक्त लढा होता १९७४ मधला रेल्वे कामगारांचा अखिल भारतीय संप, ज्याने देशातील समस्त कामगार वर्गाला भारून टाकले. अमानुष दमन आणि अन्यायाला तोंड देऊन २१ दिवस चाललेला हा संप अगदी आजही कामगार वर्गासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. सिटूने रेल्वे कामगारांना संयुक्त संघर्षाच्या मार्गावर आणण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. तो ऐतिहासिक संप ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला त्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल (एनसीसीआरएस) मध्ये आयएनटीयुसी वगळता सर्व महत्वाच्या केंद्रीय कामगार संघटना सहभागी होत्या. सिटू एनसीसीआरएसचा एक सक्रीय घटक होती. तिने अन्यायाग्रस्त कामगारांना कायदेशीर मदत व इतर सर्व प्रकारची मदत दिली. पाठिंबा दिला व त्यांच्याशी एकजुट दर्शविणाऱ्या कृती केल्या.
·         आणिबाणीत प्रचंड दमन आणि लोकशाही अधिकार व स्वातंत्र्यावर हल्ले होऊनही सिटूने जनसंघर्षांना सक्रीयपणे पाठिंबा दिला आणि आयएलओमध्ये तक्रार नोंदवून सरकारकडून कामगार संघटना अधिकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना उघडे पाडले.
·         दुसरी लक्षणीय घटना म्हणजे केंद्रातील जनता पार्टी सरकारने १९७८ साली आणलेल्या कुप्रसिद्ध औद्योगिक संबंध विधेयकाच्या विरोधातील संयुक्त लढा, जे विधेयक शेवटी मागे घ्यावे लागले. त्या प्रक्रियेत १९८१ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात आयएनटीयुसी व्यतिरिक्त सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र महासंघांच्या नॅशनल कॅम्पेन कमिटी ऑफ ट्रेड युनियन्सचे गठन करण्यात आले.
·         कामकाजी महिलांना संघटित करण्याचे कार्य हे एक वर्गीय कार्य आहे, कामगार वर्गाला संघटित करण्याच्या आणि वर्ग संघर्ष मजबूत करण्याच्या कार्याचा तो एक अविभाज्य भाग आहे ही स्पष्ट समज घेऊन त्यावर विशेष लक्ष केंद्रित करणारी सिटू ही अग्रणी संघटना होती. कोणत्याही केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने कामकाजी महिलांचे पहिले राष्ट्रीय संमेलन सिटूने सर्वप्रथम १९७९ साली आयोजित केले आणि आपले कामकाजी महिलांमधील काम पुढे घेऊन जाण्यासाठी अखिल भारतीय कामकाजी महिला समन्वय समितीचे गठन केले. या चार दशकांच्या अविरत कामामुळे सिटूमधील महिला कामगारांची संदस्य संख्या ३३ टक्क्यांच्या पुढे गेली आहे, सर्व पातळ्यांवरील निर्णय घेणाऱ्या कमिट्यांवर आणि एकूणच सर्व कामकाजातील महिलांच्या सक्रीय सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
·         आयएनटीयुसी वगळता सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन पहिला देशव्यापी सार्वत्रिक संप १९ जानेवारी १९८२ रोजी पुकारला होता, जो अशा प्रकारचा तिसरा ऐतिहासिक संयुक्त संघर्ष होता आणि त्यात सिटूने प्रमुख भूमिका निभावली होती. या संपाच्या माध्यमातून कामगार वर्गाने शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्या देखील उचलल्या होत्या आणि देशातील विविध भागांमध्ये त्यांचा त्या संपात सक्रीय सहभाग देखील होता. त्या दिवशी देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पोलिस गोळीबारात शेतमजुरांसहित १० कामगार शहीद झाले.
·         सार्वजनिक क्षेत्रांमधील कामगार संघटनांना एका संयुक्त मंचावर आणण्यात आणि सार्वजनिक क्षेत्र कामगार संघटना समन्वय समितीचे (सीपीएसटीयु) गठन करण्यात सिटूने आघाडीची भूमिका बजावली.
·         देशात नवउदारवादी सुधारणांचे आगमन झाल्यापासून सिटूने, समस्त कामगार संघटना चळवळीला, सर्व केंद्रीय कामगार संघटनांना आणि अखिल भारतीय पातळीवरील स्वतंत्र औद्योगिक फेडरेशन्सना, संयुक्त संघर्षामध्ये एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. कामगार संघटनांच्या प्रायोजक समितीने अनेक देशव्यापी सार्वत्रिक संपांचे नेतृत्व केले. २००९ मध्ये पहिल्यांदाच आयएनटीयुसी आणि बीएमएस सहित सर्व केंद्रीय कामगार संघटना संयुक्त मंचावर एकत्र आल्या, ज्याच्या वतीने फेब्रुवारी २०१३ च्या दोन दिवसीय संपासहित तीन देशव्यापी सार्वत्रिक संप आयोजित केले गेले. परंतु केंद्रात भाजप प्रणित सरकार सत्तेत आल्यानंतर बीएमएस संयुक्त कामगार संघटना चळवळीमधून बाहेर पडली. कामगार संघटना संयुक्त चळवळीच्या नेतृत्वाखाली एकूण १८ देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारले गेले. अगदी अलिकडच्या म्हणजे ८-९ जानेवारी २०१९ च्या ऐतिहासिक संपात सुमारे २० कोटी कामगार सहभागी झाले आणि त्याला सर्वसामान्य जनतेचा व्यापक पाठिंबा मिळाला.
·         त्याशिवाय सिटूच्या विविध फेडरेशन्सनी त्यांच्या, कोळसा, पोलाद, मळे, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार इत्यादी क्षेत्रांमध्ये संपासहित मजबूत संयुक्त संघर्ष उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
·         सिटूच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वतंत्र मोहिमा आणि संघर्ष देखील संयुक्त मोहिमा आणि संघर्षांना प्रोत्साहन आणि प्रेरणा द्यायला कारणीभूत ठरले आहेत. परंतु जेव्हा जेव्हा इतर युनियन्सनी सरकार धार्जिणी भूमिका घेतली, जशी त्यांनी १९७१ च्या कौटुंबिक पेन्शन योजना आणि १९९५ च्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या प्रश्नामध्ये घेतली होती, तेव्हा तेव्हा वेगळे पडण्याचा धोका पत्करूनही कामगार वर्गाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सिटूने एकट्याने पुढे जायला कधीही मागे पुढे पाहिले नाही.
·         कामगार वर्गाची एकजूट विकसित करण्याबरोबरच, सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करण्याचे आपले अंतिम उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठीच्या, जनविरोधी धोरणांना परास्त करण्यासाठीच्या संयुक्त संघर्षामध्ये, उत्पादन प्रक्रियेत गुंतलेल्या शेतमजूर, किसान इत्यादी इतर सर्व मूलभूत वर्गांना आणण्याचे महत्व सिटूने जाणले आहे. कामगार, शेतमजूर आणि किसानांच्या सामायिक मागण्यांवर, तसेच १९ जानेवारी १९८२ च्या पोलीस गोळीबारात शहीद झालेल्या कामगार आणि किसानांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिटू संयुक्त मोहिमा आणि लढे संघटित करत आलेली आहे. ५ सप्टेंबर २०१८ ची मजदूर किसान संघर्ष रॅली देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आयोजित करण्यात आलेला पहिला असा लढा होता, ज्यात लाखो कामगार, किसान, शेतमजूर सामील झाले होते. या रॅलीने कष्टकरी जनतेला आणि संपूर्ण देशातील पुरोगामी घटकांना प्रेरित केले.
·         नवउदार धोरणांच्या अंमलामुळे असंघटित क्षेत्राचा विस्तार झाल्याने सिटूने, वर्गीय एकजूट करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, असंघटित क्षेत्रातील कामगारांना, त्यांच्या त्यांच्या उद्योगांमध्ये, त्यांच्या विशिष्ठ मागण्यांवर संघटित करण्याकडे आपले लक्ष वळवले. आज सिटूच्या एकूण सदस्यतेच्या ७० टक्के सदस्यता असंघटित क्षेत्रांमधून येते.
·         सिटू हे जाणते की संपूर्ण शोषणाचा अंत करण्याचे आणि समाज बदलायचे आपले स्वप्न नेत्याच्या मागे जाणारे कार्यकर्ते अशा प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणे शक्य नाही. तिने तेव्हाच्या एआयटीयुसीमध्ये असलेल्या लोकशाही विरोधी कार्यपद्धतीशी लढा दिला होता आणि म्हणूनच संघटनेअंतर्गत लोकशाहीचे महत्व सिटू अधोरेखित करते. सिटूची घटना देखील त्यावर जोर देते.
·         सिटूच्या इतिहासातील दोन महत्वाचे मैलाचे दगड म्हणजे तिने मंजूर केलेले संघटनेवरील दोन महत्वाचे दस्तावेज. १९९३ मध्ये मंजूर करण्यात आलेला पहिला संघटनेवरील भुवनेश्वर दस्तावेज म्हणजे आजही संघटना मजबूत करण्यासाठीचे मूलभूत मार्गदर्शन आहे. बदलत्या परिस्थितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, लोकशाही कार्यपद्धती आणि अगदी तळागाळातील पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा राजकीय वैचारिक विकास यावर दिलेला मूलभूत जोर यावर अधिकच भर देऊन हा दस्तावेज २०१८ मध्ये कोझीकोड येथे अद्ययावत करण्यात आला. स्पष्ट आणि उघड टीका आणि आत्मटीकेच्या माध्यमातून आपल्या कमजोऱ्या ओळखून, त्यांच्यावर मात करून संघटना बळकट करण्याचा सिटूचा निर्धार, भुवनेश्वर दस्तावेज आणि कोझीकोड दस्तावेज दर्शवतात. सिटूची ही स्पष्ट समज आहे की तिचे राजकीय कार्य, संघटनात्मक कार्यापासून वेगळे करता येणार नाही.
आज, जेव्हा आपण आपल्या संघटनेची सुवर्ण जयंती साजरी करत आहोत, तेव्हा आपण देशातील कामगार संघटना चळवळीच्या इतिहासामधील आपल्या गौरवशाली भूमिकेकडे अभिमानाने पाहू शकतो. आपण त्या हजारो कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लढ्याचा आणि त्यागाचा वारसा पुढे घेऊन जात आहोत, जे मानत होते की शोषणकारी भांडवलशाही व्यवस्थेला समाजवादच एकमेव पर्याय आहे. आपण त्यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत, ज्यांनी एका शोषणविहीन समाजाची कल्पना केली, जेव्हा एका दशकापूर्वी त्यांनी पहिल्या राष्ट्रीय कामगार संघटना केंद्राची स्थापना केली.
म्हणूनच, आपण आपली सुवर्णजयंती या घोषणेनी साजरी करीत आहोत लढा आणि त्यागाची १०० वर्षे! वर्गीय एकजुटीसाठीच्या संघर्षाची ५० वर्षे! – हा वारसा पुढे घेऊन जाऊया.
सिटूच्या स्थापनेच्या वर्षभराच्या सुवर्णजयंती उत्सवा दरम्यान आपण आपली क्रांतिकारी उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी स्वत:ला पुन्हा एकदा समर्पित करुया. हे वर्ष आपण, समाज परिवर्तनामधल्या कामगार वर्गाच्या भूमिकेबद्दल त्याला जागृत करण्यासाठी समर्पित करुया.
न पोहोचलेल्यांपर्यंत पोहोचा!
प्रश्नांना धोरणांशी जोडून घ्या!
धोरणांच्या मागे असलेल्या राजकारणाला उघड करा!
सजग सक्षम समर्पित कार्यकर्त्यांचा विकास!
व्यापक वर्गीय एकजुटीसाठी! तीव्र वर्ग संघर्षांसाठी!  
 सिटू मजबूत करा! पुढे कूच करा!   

Comments

Popular posts from this blog

कामगारांच्या मागण्यांची सनद

१० जुलै – अखिल भारतीय मागणी दिवसानिमित्त संघर्ष संकल्प सप्ताह

कामगारांच्या किमान वेतनात कपात करण्यासाठी आयएलओची मोदी सरकारशी हातमिळवणी